तीन दिवसांत सात नक्षलवादी ठार   

बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलाबरोबरील दोन चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
 
गेल्या तीन दिवसांत सात नक्षलवादी विविध कारवाईत ठार झाले. यामध्ये नक्षलवादी सुधाकर आणि भास्कर यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. त्यापैकी, दोन नक्षलवादी काल सकाळी चकमकीत मारले गेले. तर, तीन नक्षलवादी रात्रीच्या चकमकीत मारले गेले, असेही ते म्हणाले.माओवादी नेता सुधाकर, तेलंगणा राज्य समितीचा सदस्य बंदी प्रकाश, दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीचा (डीकेएसझेडसी) सदस्य पप्पा राव यांसह अन्य नक्षलवादी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने ४ जून रोजी शोधमोहीम हाती घेतली होती. 
 
शुक्रवारी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत भास्कर उर्फ मैलारापु अडेलू मारला गेला. त्याच्या नावावर ४५ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगढ आणि तेलंगणातील नक्षलवादी कारवायांत तो पोलिसांना हवा होता. त्याआधी, गुरुवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसिंह चालम उर्फ सुधाकर चकमकीत मारला गेला. त्याच्या नावावर ४० लाखांचे बक्षीस होते. अन्य पाच नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला आहेत. घटनास्थळावरुन दोन एके-४७ रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Related Articles